यशवंत चिंतनिका १७

राष्ट्रवाद व धर्मनिरपेक्षता

भारताचा राष्ट्रवाद हा बळकट करावयाचा असेल, तर धर्मनिरपेक्ष विचारावरच तो उभा करावा लागेल. धर्माधिष्ठित राष्ट्रवाद हा या देशातील राष्ट्रवादाचे तुकडे करणारा विचार ठरेल. राज्यसंस्थेने एका धर्माचा आश्रय करून येथे चालणार नाही. कित्येक कोटी लोक येथे इतर धर्मांचेही राहत आहेत. या अनेक धर्मांच्या, अनेक जातींच्या, अनेक वंशांच्या समाजांमध्ये सर्वांना एकत्र बांधणारी मोठी शक्ती म्हणून धर्मनिरपेक्ष राज्याच्या विचाराचाच स्वीकार अपरिहार्य ठरतो आणि तसा तो करावा लागेल. म्हणूनच मी असे म्हणेन, की ज्या दिवशी आमचा हा विचाराचा पाया भुसभुत होईल, त्या दिवशी आमचा राष्ट्रवाद व लोकशाही धोक्यात येईल.