लोकनेते यशवंतराव चव्हाण - ४०

यशवंतरावांवर थोर समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारांचा मोठा पगडा होता. कराडला अस्पृश्य मुलांच्या शाळेचे उद्गाटन करण्यास आले असता विठ्ठल राजमजींचे विचार यशवंतरावांना ऐकण्यास मिळाले त्यांच्या वैचारिक संस्कारामुळे यशवंतराव पुरोगामी विचाराकडे वळले. त्या संस्कारातून त्यांनी पुढे महार वतनाचा कायदा रद्द केला. नवबौद्धांना त्यांच्या अस्पृश्य जातीसाठी असणा-या सवलती पुढे चालू ठेवल्या. पुरोगामी विचारांचा दीनदलितांचा कैवारी नेता ही यशवंतरावांची प्रतिमा त्यामुळे तयार झाली.

शरद पवारांसारखा दूरदृष्टी असणारा, व्यापक जनसंपर्क लाभलेला नेता यशवंतरावांच्या मार्गदर्शनाखालीच तयार झाला. यशवंतरावानंतर इतकी लोकप्रियता लाभलेला व स्वकर्तृत्वावर दिल्लीपर्यंत धडक देणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता म्हणून आज शरद पवारांची जी प्रतिमा तयार झाली आहे त्याची जडणघडण यशवंतरावांच्या देखरेखीखालीच झाली. म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्र शरद पवारांना यशवंतरावांचे मानसपुत्र म्हणून ओळखतो. या दोघांतील फरक इतकाच की, यशवंतरावांनी राजकारणातील आपली घोडदौड काँग्रेसच्या प्रवाहात राहून, पक्षनिष्ठा सांभाळून केली, तर शरद पवारांनी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी काँग्रेस पक्ष सोडून स्वतःचा स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला.

यशवंतराव चव्हाणसाहेबाच्या आठवणी सांगताना शरद पवार म्हणतात,

“आयुष्यातील आजपर्यंतच्या माझ्या वाटचालीचा पाया चव्हाणसाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच घातला गेला. मोरारजीभाई देसाईंचा सक्त विरोध मोडून पंडित नेहरूंना महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी अनुकूल बनविण्यात चव्हाणसाहेब यशस्वी ठरले. युवक काँग्रेसच्या माध्यमातून काम करत असताना साहेबांचे प्रभावी वक्तृत्व व कुशल नेतृत्व मला मार्गदर्शक ठरले.”

शरद पवार महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एकदा त्यांच्या कॉलेजमध्ये एका कार्यक्रमानिमित्त यशवंतरावांना निमंत्रित करण्यात आले होते. मान्यवरांच्या स्वागताची जबाबदारी शरद पवारांवर होती. पाहुण्यांचे स्वागत करताना शरद पवारांनी दाखविलेला वक्तशीरपणा, बोलण्यातील अचूकता व त्याच्यांत असणारे नेतृत्वगुण यशवंतरावांनी हेरले. कार्यक्रम संपल्यानंतर यशवंतरावांनी त्याचे नाव, गाव याबाबत विचारपूस केली. तरूणवर्गामध्ये काम करण्याबद्दल यशवंतरावांनी शरद पवारांना प्रोत्साहित केले. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पहिल्या भेटीनेच प्रभावित झालेल्या शरद पवारांनी पुढील काळात राजकारणात पदार्पण केले. यशवंतरावांची कुठेही सभा, भाषण असले की शरद पवार आपल्या युवक कार्यकर्त्यांना घेऊन आवर्जून उपस्थित राहू लागले. महाराष्ट्रातील युवक काँग्रेसची जबाबदारी चव्हाणसाहेबांनी पवारांवर सोपविली. युवकांमध्ये कार्य वाढविण्यास सतत प्रोत्साहन व मार्गदर्शन केले.

१९६६ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. शरद पवारांनी बारामती विधानसभा मतदारासंघातून उमेदवारीची मागणी केली. पुणे जिल्ह्यातील तत्कालीन काही ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवारांच्या उमेदवारीस विरोध करून त्यांच्यात निवडून येण्याची क्षमता नाही, असे आग्रहाने बैठकीत मांडले. यशवंतरावांनी मुत्सद्देगिरीने या मंडळींना प्रश्न केला, “या निवडणुकीत काँग्रेसला २८८ पैकी किती जागा मिळतील.”