आमचे मुख्यमंत्री -१

मा. मुख्यमंत्र्याच्या खाजगी जीवनाबद्दल लिहिणे लेखकांनी वर्ज्य मानलेले दिसते आणि ते एका दृष्टीने बरोबरच आहे. कारण या पुस्तकाचा हेतू हा मा. मुख्यमत्र्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा आढावा घेणे हा आहे, त्यांची चरित्रे रेखाटणे हा नव्हे.

मा. मुख्यमंत्र्यांचे दोष आणि त्यांच्यापैकी काहीजणांनी केलेल्या अप्रिय कृतींचा उल्लेख करण्याचे लेखकांनी टाळलेले नाही. जे वास्तव आहे ते प्रांजलपणे आपल्यासमोर मांडलेले आहे. तसेच मूल्यमापन करताना काही ठिकाणी लेखकांची भाषा परखडही झालेली दिसते. त्यामुळे हे पुस्तक म्हणजे गुडी गुडी चा प्रकार नाही हे वाचताना जाणवत राहते आणि म्हणूनच त्याची वाचनीयता मनाला भावते.

महाराष्ट्राचा स्वातंत्र्योत्तर राजकीय प्रवास शब्दांकित करणारा अत्यंत उपयुक्त असा संदर्भग्रंथ असे मी या पुस्तकाचे थोडक्यात वर्णन करेन.

डॉ. रायरीकरांचे आणि माझे कामगार जगतापासूनचे फार संबंध असल्यामुळे आणि त्यांच्या अभ्यासू व हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात संपूर्णपणे झोकून देण्याच्या वृत्तीमुळे मला नकार देणे अगदी जिवावर आले. म्हणूनच ही प्रस्तावना. ईश्वर ह्या लेखकद्वयीस उदंड आयुष्य देवो व अनेक लिखाणे, पुस्तके व ग्रंथ त्यांच्या हातून समाजासाठी लिहून होवोत ही प्रार्थना. लेखकद्वयीस माझ्या हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद!

-नरेंद्र तिडके
३० एप्रिल २००७