यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ८६

या त्यांच्या विचारांवरून यशवंतरावांची लोकशाहीवरील निष्ठा किती सजग आणि अविचल होती हे स्पष्ट होते. कोणतेही राजकीय विचार बोलून नंतर त्यावर विचार करण्यापेक्षा बोलण्यापूर्वी ते विचार करत. त्या विचारांची वास्तव परिस्थितीशी पुन्हा पुन्हा तपासणी करत.  मांडलेला विचार प्राप्त परिस्थितीशी पूरक आहे किंवा नाही याचा ते गंभीर विचार करत. त्यांनी नेहमी स्वत:च्या मर्यादा ओळखून नेतृत्व केले. राजकारणामध्ये केवळ वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाळगून यश मिळत नाही. म्हणून महत्त्वाकांक्षेच्या मोहजाळात राजकारणात फारसे पडू नये असे ते सांगतात. याउलट आपले नेतृत्व हे सर्वसमावेशक असावे. सर्व सामाजिक थरांचा विश्वास असलेले व सर्व सामाजिक थरांना विशेषत: खालच्या मानल्या गेलेल्या थरांतील कार्यकर्त्यांना विश्वासार्ह्य वाटणारे व कार्याच्या भागीदारीत भाग घेणारे नेतृत्व म्हणजे नवे सामाजिक नेतृत्व होय. निरनिराळ्या पातळीवर लोकशाही संस्था निर्माण झाल्याशिवाय आपण लोकशाही नेतृत्व निर्माण करू शकणार नाही. लहानलहान क्षेत्रात काम करणा-या ह्या लोकशाही संस्थांतूनच भावी नेते तयार होतील." अशा नेत्यांनी सतत सत्तेच्या जोखमीचे भान मनात ठेवून राजकीय सत्तेचा कारभार करावा. सत्तेचा लाभ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचता करावा. वैयक्तिक स्वार्थ त्यामध्ये असता कामा नये. एखाद्या कार्यकर्त्यांची जर परीक्षा घ्यावयाची असेल तर त्यांच्यामध्ये जिद्द आहे की नाही हे प्रथम पाहणे महत्त्वाचे आहे. पदांची अभिलाषा न धरता त्या पक्षाची पुरोगामी शक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी त्याग सहन केला पाहिजे. अन्यायाविरुद्ध लढण्याची, विषमतेविरुद्ध लढण्याची जिद्द, ईर्षा त्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. फक्त विचारांचे डोस देऊन चालणार नाही तर ते काम अंत: करणापासून केले पाहिजे. " पक्ष हे विचाराच्या निष्ठेनेच चालले पाहिजेत असा तुमचा आमचा आग्रह असला पाहिजे."  प्रत्येक पक्षात काम करणा-या त्या व्यक्ती व पक्षावर अढळ अशी श्रद्धा व निष्ठा असावी असे ते सांगतात. सामाजिक परिस्थिती, लोकांच्या गरजा आणि वृत्ती, विरोधकांचे आक्षेप आणि प्रतिक्रिया यावर ते विशेष भर देतात. याचबरोबर संघटनात्मक कार्याला वाहून घेणारी क्रियाशील तरुण कार्यकर्त्यांची फळी उभारण्याची गरज आहे असे ते सांगतात, 'वैयक्तिक महत्त्वाकांक्षेची दृष्ट महाराष्ट्राच्या काँग्रेसला लागू देऊ नका.' मला सत्तेचा मोह नाही पण विचारांचा जरूर आहे.... सत्तेचा वापर करीत असताना पक्षांनी किंवा माणसांनी आपणाला मिळालेल्या सत्तेचा वापर आपण दररोज कशासाठी करीत आहोत हे तपासून घेतले पाहिजे... समाजवादाचं निशान हाती घेऊन जीवनातल्या अखेरच्या क्षणापर्यंत मी निर्धारानं लढा देईन पण काँग्रेसचं ऐक्य दुभंगू देणार नाही." अशी त्यांची पक्षनिष्ठा होती. आपले हे विचार ते अतिशय संयमाने सांगत. आपुलकीने बोलत. आपल्या विचाराशी ते आग्रही राहत. बोलताना त्यांचा तोल कधीही ढळला नाही.  शब्दांची निवड मोठ्या कौशल्याने करत. समोरचा श्रोता पाहून भाषणाची पट्टी ते ठरवत. आठवणी, प्रसंग, विनोद दृष्टांत यांचा समप्रमाणात मसाला घालून जे सांगायचे ते अतिशय रूचकरपणे सांगत. अगोदरच्या वक्त्याने काही बंडखोर भाषण किंवा वादाचा प्रश्न निर्माण केला असेल तर ते नेमके लक्षात ठेवून आपल्या भाषणात त्याचा खरपूस समाचार घेऊन त्या वक्त्याला आनंद मिळावा इतका गंतमीदार पालट घेत. बोलण्यात जितका जिव्हाळा तितकाच प्रेमळपणा तर प्रसंगी तेवढाच खंबीरपणा दिसतो. कमी, मार्मिक पण सूत्रबद्ध असे बोलणारे, डावे आणि उजवे यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेतृत्व व वक्तृत्व त्यांच्याकडे होते.

परराष्ट्र धोरण

यशवंतरावांनी भारतीय जवानांना पुरुषार्थाची प्रेरणा आपल्या भाषणांतून दिली. आपल्या विचामंथनातून भारताच्या संरक्षणाचा प्रश्न आणि परराष्ट्र नीतीचा प्रश्न हिंदुस्थान प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने सोडविले. संरक्षणमंत्री, गृहमंत्री व परराष्ट्र आणि अर्थमंत्री असताना त्यांनी या विषयांवर अनेक भाषणे दिली आहेत. या भाषणांतून देशाच्या ऐक्याचा आणि स्थैयाचा प्रश्न त्यांनी मांडला. त्या काळातील त्या समस्यांचे चित्रण त्यांनी या भाषणातून मांडले. या दृष्टीने त्यांची पुढील भाषणे उल्लेखनीय आहेत. 'आजचा क्षात्रधर्म','संरक्षणाचा अन्वयार्थ', 'संरक्षणाची मूलसूत्रे', 'आमचे हुकुमी पत्ते', 'व्यर्थ न हो बलिदा', 'संकट ही संधी', 'गृहमंत्रीपदाचे कसोटीचे वर्ष', 'परराष्ट्र धोरणाची दिशा', 'परराष्ट्र धोरणाची मार्गदर्शक मूलतत्त्वे', 'जनता सरकारचे परराष्ट्रीय धोरण' इत्यादी. त्यांच्या 'युगांतर' 'भुमिका' या पुस्तकात भाषणे समाविष्ट केली आहेत.