आमचे मुख्यमंत्री -७७

22  sushilkumar shinde
२२. श्री. सुशीलकुमार शिंदे

संयुक्त महाराष्ट्राचे चौदावे मुख्यमंत्री
(१८-१-२००३ ते ३०-१०-२००४)

राजकारण्यांमध्ये सुशीलकुमारजी शिंदे हे एक हसरे व्यक्तिमत्व आहे. निरभिमानी, सर्वांशी जवळीक साधणारा असा हा एक नेता आहे. ह्या अर्थाने ते लोकनेते आहेत. अत्यंत गरीब कुंटुबात जन्म घेऊन भारताच्या उपराष्ट्रपतीपदाकरता नामांकन पातळीवर पोहोचणे ह्याचे कारण त्या व्यक्तीत असलेले दुर्मिळ सद्गुण. तसे म्हटले तर मुख्यमंत्री म्हणून सुशीलकुमारजींची कारकीर्द थोडीच ठरली.

जन्म व शिक्षण आणि आयुष्याची घडण

मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील (आता धाराशीव) परांडे गावचे शिंदे घराणे सोलापूरला त्यांच्या आजोबांच्या काळात स्थायिक झाले. सुशीलकुमार हे त्यांच्या आईचे चौथे अपत्य. मूळचे नाव बदलून नाटकात भाग घेताना सुशीलकुमार हे नाव त्यांनी घेतले.

सुशीलकुमारांचा जन्म सप्टेंबर महिन्यात १९४१ साली झाला. लहानपणी त्यांच्या सावत्र आईने त्यांच्यावर चांगले संस्कार केले व त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण केली. त्यांचे बालपण दारिद्र्याशी झगडण्यात गेले. त्यांना पैशाकरता अनेक उद्योग करावे लागले. आठवीपर्यंत त्यांचे शिक्षण रात्रशाळेतच झाले. त्यांनी काही काळ कोर्टातील शिरस्तेदाराचे शिपाई म्हणून काम केले व त्यावेळी ते बेंचमार्क क्लार्क होते, त्यावेळी त्यांनी ह्या नोकरीचा राजीनामा दिला. सुदैवाने त्यावेळी ते बी.ए. झाले होते. कॉलेजमध्ये असताना त्यांनी कॉलेजच्या विविध कार्यक्रमांत भाग घेतला. त्यांच्या मनात वकील होण्याची महत्वाकांक्षा होती. कायद्याचा अभ्यास करताना त्यांनी पुण्याच्या लॉ कॉलेजमध्ये नाव घातले. परंतु त्याचवेळी त्यांची सी.आय.डी. सबइन्स्पेक्टर म्हणून निवड झाली (६ डिसेंबर १९६५). नंतर त्यांनी न्यू लॉ कॉलेजातून (मुंबई) लॉची पदवी मिळविली (१९६९).

राजकारणात प्रवेश

१ मे १९७० रोजी त्यांचे उज्ज्वला वैद्य यांच्याशी लग्न झाले. ह्याच काळात त्यांचा शरद पवारांशी परिचय झाला. ह्या तरुणात राजकारणामध्ये प्रवेश करण्यास लागणारे काही गुण आहेत हे शरद पवारांच्या दृष्टीस आले. त्यांनी सुशीलकुमारजींना नोकरीचा राजीनामा देण्यास सांगितले (६ नोव्हें १९७१) आणि कॉंग्रेस फोरम फॉर सोशालिस्ट ॲक्शन ह्या संस्थेच्या निमंत्रकपदाची सुत्रे घेण्यास सांगितले. ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात असे म्हणावयास हरकत नाही.