थोरले साहेब - २३०

प्रिय सौ. वेणू,

माझ्यावर रागवली नसणार असं गृहित धरून माझ्या मनातील घुसमट या पत्रात लिहून मी माझं मन तुझ्यासमोर मोकळं करीत आहे.  आपलं लग्न होऊन दोन महिने लोटले.  नववधू अनेक स्वप्न मनात घेऊन या नव्या विश्वात रमण्यास येते.  तरूणपणाच्या भावनेचा उन्मेष व्यक्त करण्याच्या उर्मी उरात बाळगून काही स्वप्न रंगवायची असतात; याची मला कल्पना आहे.  या भावनांचा विचार न करता, तुला न सांगता-न बोलता मुंबईला निघून आलो.  अपराधी मनानं मी हा निर्णय घेतला.  हा निर्णय घेताना माझ्या मनाला काय यातना झाल्या असतील याची तुला कल्पनाही येणार नाही.  तारूण्यातील भावनांनी जर बुद्धिचा ताबा घेतला तर मनुष्य ध्येयापासून दूर जाण्याचा धोका असतो.  मला माझ्या ध्येयापासून दूर करण्यास तू कारणीभूत झालीस असा ठपका तुझ्यावर येऊ नये; असं मी ठरविलं आणि पुढेही मी प्रयत्‍न करीत राहीन.  त्यातलाच हा तुला न सांगता मुंबईला निघून येण्याचा माझा निर्णय.  तू माझं हृदय आहे तर स्वातंत्र्य चळवळ माझा श्वास आहे.  श्वास आणि हृदय यांचा समन्वय माणसाला जिवंत ठेवतो.  मला जिवंत राहण्यास श्वास आणि हृदय सारखेच महत्त्वाचे आहेत.  मी दोघांपासून दूर जाऊ इच्छित नाही.
--------------------------------------------------------------------------------------------
या कादंबरीच्या सूत्रधार वेणुताई आहेत.  वेणुताई १९४२ साली विवाहानंतर चव्हाण कुटुंबीयांत कर्‍हाडला दाखल झाल्या.  वेणुताईंचा मृत्यू १९८३ साली दिल्ली येथे झाला.  हा सर्व काळ त्या साहेबांची सावली बनून राहिल्या.... थोरांच्या कौटुंबिक जीवनाविषयी सामान्यांना जिज्ञासा असते.  महाराष्ट्राच्या या जाणत्या राजाच्या कौटुंबिक आयुष्याबद्दल ती आहेच.  ती जिज्ञासा या लिखाणामुळे पूर्ण हेते.  'थोरल्या साहेबां'च्या निमित्ताने वेणुताईंच्या नजरेतून महाराष्ट्राचा जो राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व पक्षीय राजकारणाचा इतिहास नजरेसमोर येतो तो सध्याच्या पिढीला उद्‍बोधक ठरेल.

इतिहासाच्या चौकटी न मोडता घटनांशी इमान राखून लिहिलेल्या या रसाळ कादंबरीबद्दल प्रा. डॉ. विजय पाथ्रीकरांचे उभा महाराष्ट्र अभिनंदन करेल.

विनायक पाटील
(माजी मंत्री-महाराष्ट्र राज्य) कदंबवन, नाशिक
----------------------------------------------------------------------------------------------

'थोरले साहेब' हे पुस्तक लिहून शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. डॉ. विजय पाथ्रीकरांनी महाराष्ट्रातील साहित्यक्षेत्रात मोलाची भर घातली आहे.  देवराष्ट्रे, कराड, मुंबई व दिल्ली हा स्व. यशवंतरावजींच्या जीवनाचा घटनाक्रम त्यांनी अतिशय परिणामकारक आणि इतिहासाशी प्रामाणिक राहून लिहिला आहे.  'कृष्णाकठ' हे साहेबांचे आत्मचरित्र.  'सागरतट', 'यमुनातीर' लिहायचे राहून गेले.  प्रा. डॉ. विजय पाथ्रीकरांनी ते काम पूर्ण केले.  स्व. यशवंतरावजींच्या जीवनातील सर्व घटनाक्रम सौ. वेणुताईंच्या मुखातून वदविताना लेखकांनी कमालीची सावधानता बाळगली आहे.  यशवंतराव हे सौ. वेणुताईंना कधीही विसरू शकले नाहीत.  एवढे मोठे प्रतिभासंपन्न, महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्राचे शिल्पकार, राजकीय स्तरावरील मुत्सद्दी, परदेशातही आपली वेगळी प्रतिमा उमटविणारे स्व. यशवंतरावजी सौ. वेणुताईंच्या मृत्यूने खचले.  ते सैरभैर झाले.  

मराठी साहित्यसंपदेत मोलाची भर प्रा. डॉ. विजय पाथ्रीकरांनी घातली त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद.

श्रीनिवास पाटील
आय.ए.एस.(निवृत्त), माजी खासदार, कराड