इतिहासाचे एक पान.. ७

शकुनाचा श्रीकार

भारतीय गणराज्याचे सुविख्यात परराष्ट्रमंत्री माननीय श्री. यशवंतराव चव्हाण हे एक असाधारण व्यक्तिमत्त्व आहे. महाराष्ट्रांतील एका आडवळणी खेड्यांत त्यांचा जन्म झाला. त्यांचे जन्मदातेहि कुणी नामांकित नव्हते. भारतांतले करोडो शेतकरी अज्ञान आणि दारिद्र्य यांच्या संगतींत काळ कंठीत होते, त्यांतीलच तेहि एक.

बालवयांत श्री. यशवंतरावांना कुणी द्रष्टा मार्गदर्शक लाभला आणि त्याने त्यांचा आजच्या पदापर्यंतचा मार्ग अचूकपणें आखून दिला असेंहि नाही.

यशवंतराव अंगच्या वाढीने वाढले. देशकाल-परिस्थिति घडवील तसे ते घडले गेले. स्वत:च्या पायांनी चालू लागले. मागे उमटलेल्या पदचिन्हांच्या पाऊलवाटा झाल्या. त्यांच्या चालणा-या पायांतूनच जणू त्या वाटांचे उगम झाले. त्या अनुसरत चालणारे असंख्य अनुयायी त्यांना लाभले. यशवंतरावांना नेतेपणाचा लाभ झाला. तें नेतृत्वहि त्यांनी निभाविलें, पेललें. आपला तोल जाऊं दिला नाही. अनुयायांना अनुचित दिशा दाखविली नाही. आपणाहून मोठे मानले. त्यांना अडचणींत आणलें नाही.

वैयक्तिक संधि आणि सन्मान त्यांच्याकडे चालतच आले. हव्यास त्यांना करावाच लागला नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगमनशील राज्याचा मुख्य मंत्री म्हणून त्यांनी कामगिरी केली. खरोखरीच एका कल्याणकारी लोकराज्याचा पाया त्यांनी भरभक्कम केला.

एका लहानशा खेड्यांत जन्मलेला हा एका श्रमिकाचा मुलगा. या खंडतुल्य देशाचा संरक्षणमंत्री झाला. गृहमंत्री म्हणून गाजला. अर्थमंत्री म्हणून वाखाणला गेला. आज परराष्ट्रमंत्री म्हणून यशस्वीपणें वावरतो आहे, ही सारी नवलकथाच आहे. त्यांच्या चरित्रांतील ओळी ओळी वाचतांना, वाचक आपली एकाग्रता रतिमात्र ढळूं देणार नाहीत हें निश्चित.

त्या मानाने, यशवंतरावांविषयी त्यांच्या मायबोलींतहि फार थोडें लिहिलें गेलें आहे. अन्य भाषांविषयी मला नेमके माहीत नाही; पण इंग्रजी-मराठींत तरी त्यांच्याविषयी प्रकाशनें झाली ती फार थोडी. कृ. भा. बाबर, बाबूराव काळे, द्वा. भ. कर्णिक, शहा, टी. व्ही. कुन्ही कृष्णन् अशा अगदी थोड्या लेखकांनी त्यांच्याविषयी थोडेंफार लिहिलें. कोणी एका विशिष्ट घटनेशीं येऊन विसावलें. कोणी एखादा विशिष्ट कालखंडच वर्ज्य मानला. त्यांचें समग्र चरित्र असें वाचकांसमोर आलेंच नाही.