इतिहासाचे एक पान.. १७

नवं गाव, नवे न्यायाधीश. नवं वातावरण अशी कालक्रमणा आता कराडांत सुरु झाली. बेलिफ म्हणून पगार मिळत असला, चार पैसे हातांत येत असले तरी कराडला आल्यामुळे बळवंतरावांचा शेतीचा संबंध संपला. शेतीच्या उत्पन्नाची निश्चिति अगोदरहि नव्हती. भाऊंबदांवर अवलंबून राहून त्याचा कांही उपयोग होणार नव्हता. त्यामुळे बेलिफ म्हणून मिळणारा पगार एवढाच संसाराचा आता आधार उरला. परंतु हळूहळू तेवढ्या तुटपुंजा पगारांत सहाजणांचा संसार चालविणं कठीण आहे असं अनुभवाला येऊं लागलं. यांतून कांही तरी मार्ग काढणं आवश्यकच होतं. बळवंतराव आणि विठाई यांनी त्यांतून मग तोड काढली. विठाईच्या घरची-दाजीबा घाडगे यांची स्थिती त्यांतल्या त्यांत बरी. शेतीचं थोडं-फार उत्पन्न मिळत होतं. म्हणून मग एका मुलाला आजोळीं पाठविण्याचा मनसुबा ठरला. ज्ञानोबा, राधाबाई, गणपत कराडला आणि यशवंत देवराष्ट्र इथे - आजोळीं, अशी वांटणी झाली.

विटें ते कराड अशी नोकरीसाठी बळवंतरावांची बदली झालेली असली तरी, नियतीची आज्ञा कांही वेगळीच होती. घडल्यानंतर उमजतो तो निर्णय नियतीचा. नियतीचे नियम डोळ्याला कधी कुणाला दिसलेले नाहीत. पण कुठे तरी ते असतातच ! अंधार जसा कधी येत नाही आणि जात नाही, प्रकाशांत त्याचा अभाव असतो आणि प्रकाश जातांच प्रतीत होतो तसंच नियतीचं असलं पाहिजे. ती असतेहि आणि नसतेहि. प्रतीत मात्र होते.

बळवंतरावांच्या डोळ्यापुढे विट्यांत सुरुवातीला अंधारच होता. बेलिफाच्या नोकरीच्या प्रकाशांत कांही काळ त्याचा अभाव निर्माण झाला. त्या प्रकाशांत वाट चालतच ते कराडला पोंचले. अंधार आपला पाठलाग करत आहे याची जाणीवहि त्यांना नसावी.

पहिलं महायुध्द उतरणीला लागलेला १९१७-१८ चा तो काळ. युध्द संपत आलं होतं. अन् त्याच वेळी हिंदुस्थानांतील जनता प्लेगसारख्या महाभयंकर सांथीशीं सामना करीत होती. प्लेंगनं जिकडे-तिकडे कहर माजविला. कुटुंबच्या कुटुंब नामशेष झालीं. कराडलाहि प्लेगचं थैमान सुरु झालं. ते दिवस सुगीचे होते. गावांत प्लेग शिरल्यानं गाव बाहेर पडूं लागलं. बळवंतरावांनाहि गावाबाहेर पडणं आवश्यकच होतं. म्हणून त्यांनी विठाई व मुलं यांची माहेरीं - देवराष्ट्र गावाला रवानगी केली. स्वत: कराडांतच राहिले. नोकरीचं बंधन होतं. त्यासाठी त्यांना गावांत रहावंच लागलं. दिवस चालले होते. या ना त्या कुटुंबावर प्लेगची स्वारी रोज सुरु होती. हाहाकार उडत होता. बळवंतराव तें दु:ख पहात होते. नोकरी करत होते. मधून मधून देवराष्ट्राला जाऊन मुलांना पाहून येत होते.