प्रकाशकीय-५

लोकशाही विकेंद्रीकरण समितीच्या अहवालावरील चर्चेस उत्तर देताना
श्री. चव्हाण सभागृहात म्हणाले की, विकेंद्रीकरण लोकशाही पद्धतीने अंमलात आणण्यात येईल आणि पंचायत राज्य व सहकारी संस्था यांचे सहाय्य हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घेण्यात येईल

अशा प्रकारे मा. श्री. यशवंतराव चव्हाण हे आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण करण्यात यशस्वी झाले. संरक्षणमंत्री पदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी पं. नेहरूंनी मा. श्री. यशवंतरावांना दिल्लीस बोलाविले. सरंक्षणमंत्री पदाची सूत्रे घेण्यासाठी दिल्लीस जाण्याच्या प्रसंगी सभागृहाने त्यांच्या कारकीर्दीचा गौरवपूर्ण शब्दांनी उल्लेख केला. त्यावेळी ना. श्री. यशवंतरावांनी कृतज्ञतापूर्ण भाषण केले- हे भाषण इतके उत्कृष्ट आहे की ते वाचकांस उत्स्फूर्त वाटावे.

अशा प्रकारच्या विधीमंडळात मा. श्री. यशवंतरावांनी केलेल्या भाषणांपैकी ४७ निवडक भाषणे आम्ही जनतेपुढे या ग्रंथाद्वारे ठेवीत आहोत. मराठी जनता ह्या ग्रंथाचे स्वागत करील अशी आशा बाळगतो. भारताच्या आधुनिक इतिहासाच्या अभ्यासकास या मालिकांचा उपयोग इतिहासाचे अव्वल साधन म्हणून मौलिक ठरेल असा विश्वास वाटतो.

या संग्रहात समाविष्ट केलेली भाषणे ही संबंधित विषयांच्या संदर्भात केलेली भाषणे आहेत. तसेच त्या कालखंडातील राजकीय व सामाजिक परिस्थितीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ही भाषणे केलेली आहेत. जनसामान्यांच्या मनातील आशा-आकांक्षा समजून घेण्याच्या बाबतीत तर मा.श्री.यशवंतरावांचा हातखंडा होता. महाराष्ट्रातील सर्व सामाजिक थरातील जनतेबरोबर सुसंवाद स्थापन करण्यात मा. श्री. यशवंतराव यशस्वी झाले होते. मा. श्री. यशवंतरावांची सामाजिक एकात्मतेची तळमळ, महाराष्ट्राच्या विकासासंबंधीच्या कल्पना, मा. श्री. यशवंतरावांचा सुसंस्कृतपणा,  राजकारणातील सहिष्णुता, राजकारणातील मतभेद असलेल्या पक्षाच्या व्यक्तींशीही आदराने वागण्याची सौजन्यशील दृष्टि आणि खरा लोकशाही दृष्टिकोन या भाषणात पदोपदी प्रतिबिंबित झालेला आहे.

आण्णासाहेब शिंदे
उपाध्यक्ष
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई
उपाध्यक्ष
राज्यनियोजन मंडळ,
नियोजन विभाग,