प्रकाशकीय

Ychavan speeches
विधीमंंडळातील भाषणे

लेखक : आण्णासाहेब शिंदे
--------------------------------
प्रकाशकीय

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा

यशवंतराव चव्हाण निवर्तल्यावर त्यांचे सहकारी, हितचिंतक, अनुयायी यांनी त्यांचे यथोचित स्मारक करण्याचे ठरवून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ही संस्था स्थापिली. या संस्थेने यशवंतरावांच्या इ.स. १९४६ ते १९७७ पर्यंतच्या कालखंडातील मुंबई/महाराष्ट्र विधीमंडळातील व संसदेतील त्यांची भाषणे, आणि त्यांच्या वैयक्तिक पत्रव्यवहारांचे खंड यांच्या मालिका छापण्याची एक महत्त्वपूर्ण अशी योजना आखली.

ही योजना पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानने यशवंतराव चव्हाण जीवनकार्य संशोधन केंद्र या नावाने एक स्वतंत्र विभाग निर्माण केला. या विभागाची संशोधकीय व संपादकीय कामे सुप्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ.वि.गो. खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली व्हावीत असे ठरविले व या विभागाच्या संचालकपदी त्यांची नेमणूक केली. प्रतिष्ठानच्या या संशोधन केंद्राने मा. श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या विधीमंडळातील मराठी भाषणांचा हा प्रथम खंड तयार केला.

या खंडात प्रसिद्ध झालेली त्यांची विधानसभेतील भाषणे एखाद्या सराईत मुत्सद्याला शोभण्यासारखी अभ्यासपूर्ण व विपुल माहितीने भरलेली आढळतात. याचे  कारण
इ. स. १९४० पर्यंत मा. श्री. यशवंतरावांना बुद्धीमंतांच्या सान्निध्यातून व उदंड ग्रंथाध्ययनातून भरपूर वैचारिक खुराक मिळाला. राजकीय विचारांच्या वेगवेगळया छटा आणि त्यांचा परस्परांशी असलेला संबंध त्यांना उमगला. समाजवाद, साम्यवाद, मार्क्सवाद, गांधीवाद वगैरे विचारसरणीमधील बारकावे त्यांच्या लक्षात आले ते केवळ त्यांनी केलेल्या विविधांगी सतत वाचनामुळेच होय. शेवटी त्यांनी आपल्याला इ.स. १९४० पासून काँग्रेसच्या वैचारिक बैठकीत झोकून दिले ते शेवटपर्यंत. वैचारिक ज्ञानाची एवढी शिदोरी बरोबर घेऊन मा. श्री. यशवंतराव लोकशाही तंत्राने राज्य-कारभार करण्यासाठी विधानसभेत निवडून आले व इ.स. १९४६ मध्ये पार्लमेंटरी सेक्रेटरी झाले.

या विधीमंडळातील भाषणात मा. श्री. यशवंतराव चव्हाणांच्या संसदपटुत्वाच्या अनेक छटा आढळतात. ही भाषणे वाचताना आपल्या लक्षात येते की मा. श्री. चव्हाण हे प्रतिपक्षियांना आपल्या वादविवाद कौशल्याने लीलया नामोहरम करीत असत. हे करीत असताना ते कटू व बोचरी भाषा क्वचितच वापरीत. उलट, नर्म विनोद, उपरोधिकपणा यावर त्यांचा भर असे.